पांढरकवडा सागर मुळे महाराष्ट्र शासन आरोग्य व्यवस्थेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देते जेणेकरून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था ...
पांढरकवडा
सागर मुळे
महाराष्ट्र शासन आरोग्य व्यवस्थेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देते जेणेकरून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत तसेच सर्वसामान्यांच्या हिताची व आरोग्य दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण असावी. हा प्रमुख हेतू लक्षात घेता महाराष्ट्रातील प्रत्येक गावपातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय उभारली मात्र महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यवस्थेतील महत्त्वपूर्ण कडीला छेद मिळतो तो ग्रामीण रुग्णालयातील प्रशासन कारभारात, पांढरकवडा तालुक्यातील करंजी रोड येथील ग्रामीण रुग्णालय सध्या येथील बेधुंद प्रशासनाने चर्चेत आहे.
करंजी ग्रामीण रुग्णालयात महत्वाचे विभाग बंद असून लाखो रुपयांची आरोग्य साहित्य धूळखात आहे. येथील रक्ततपासणी रिपोर्ट मिळण्यास 4 ते 8 दिवस लागतात. शिवाय रिपोर्ट सदोष असतात. करंजी ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे विभागच गेल्या काही महीण्यापासून बंद असून रुग्णांना बाहेरगावी जाऊन एक्स-रे काढावा लागतो. रुग्णांना सरसकट रेफर करण्याचं प्रमाण वाढून आहे. तसेच चक्क ओपीडी वेळेत रुग्णालयात कर्मचारी आणि डॉ बेपत्ता आढळतात, शिवाय ड्यूटीवर असलेले डॉ रुग्णालयात हजर नसतात. अपघात घडल्यास ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका देण्यास रुग्णालय प्रशासन नकार देतात परिणामी उपचार अभावी रुग्ण दगावण्याची भीती निर्माण झाली आहे. करंजी रोड हे गाव राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर बसलेलं असून अपघाती आपत्कालीन वेळेत करंजी ग्रामीण रुग्णालया शिवाय पर्याय नसतो याशिवाय परिसरातील हजारो ग्रामीण शेतकरी, शेतमजूर, आणि सर्वसामान्य लोक करंजी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत असतात मात्र करंजी ग्रामीण रुग्णालयातील रामभरोसे प्रशासनामुळे सर्वसामान्य रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी जिल्हा प्रशासनाने करंजी रोड ग्रामीण रुग्णालयातील प्रशासनाकडे लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहे
No comments