Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

मासिक पाळी ; रूढी,परंपरा समज आणि गैरसमज याचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम

पब्लिक पोस्ट वडकी : मासिक पाळी ही मुलींच्या शरीरामध्ये घडणारी एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे.साधारणपणे ११ ते १४ या वयोगटामध्य...





पब्लिक पोस्ट

वडकी : मासिक पाळी ही मुलींच्या शरीरामध्ये घडणारी एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे.साधारणपणे ११ ते १४ या वयोगटामध्ये मुलींना पाळी येण्याची सुरू होते. दर २८ ते ३० दिवसांनी गर्भाशयाच्या आवरणातून रक्तस्त्राव होतो, जो साधारणतः ३ ते ७ दिवसांपर्यंत चालतो. अपवादाने काही मुलींना पाळी वयाच्या अगोदर किंवा उशिरा सुरू होऊ शकते.
मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप व इतर सुरक्षित साधनांचा वापर, पोषक आहार, शारीरिक हालचाली,पुरेशी झोप आणि आवश्यकतेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.आजही आपल्या समाजात मासिक पाळी बाबत उघडपणे बोलणे, चर्चा करणे टाळले जाते. आरोग्यास हानीकारक सिगारेट सहज विकली जाते, मात्र महिलांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेले सॅनिटरी पॅड्स घेताना पेपर मध्ये गुंडाळून घेतले जातात.
आज आपण एकविसाव्या शतकात जगतो, वैज्ञानिक सोयीसुविधांचा उपभोग घेतो.... तर्काच्या आधारे आपली बुद्धी सशक्त करण्याचा प्रयत्न करतो. पण आजही मासिक पाळी बाबत अनेक चुकीच्या समजुती, प्रथा, परंपरा आपल्या समाजात प्रचलित आहेत, जसे की,१)मासिक पाळी ही  स्त्रियांना मिळालेला शाप आहे. २)पाळीच्या काळात स्त्रिया अपवित्र असतात, त्यामुळे त्यांनी देवपूजा करू नये , धार्मिक स्थळी जाऊ नये वगैरे ३)पाळीच्या काळात घरातील मुलींना/ महिलांना वेगळे बसवावे. ४)मासिक पाळी म्हणजे शरीरातील घाण व अशुद्ध रक्त बाहेर टाकणे होय . ५)पाळी दरम्यान मुलींनी  घराबाहेर जाऊ नये. ६) माडिया व गोंड आदिवासी जमाती मधील कुर्मा प्रथा...अशा प्रकारच्या गैरसमजुती,प्रथा आपल्या समाजात आढळून येतात .ह्या सर्व बाबी अतार्किक असून स्त्रियांचे शोषण घडवून आणण्यास त्या कारणीभूत ठरतात.मासिक पाळी विषयी असलेल्या गैरसमजांमुळे महिलांवर होणारे  दुष्परिणाम .....या गैरसमजुती मुळे कधी-कधी स्त्रियांना स्वच्छता साधनांपासून वंचित रहावे लागते, ज्यामुळे त्यांना विविध संसर्गजन्य रोग, गर्भाशयाचे विकार, कुपोषण इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच, या काळात त्यांना दुजा भावाची वागणूक दिल्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड, आत्मविश्वासाची कमतरता व मानसिक ताणतणाव निर्माण होतो. पाळी आली असल्यामुळे कामाच्या ठिकाणी अनुपस्थित राहून आर्थिक नुकसान होते.अनेक वेळा पाळी मुळे मुलींना शाळेत जाण्यापासून रोखले जाते, त्यातून मुलींमध्ये शैक्षणिक गळतीचे प्रमाण वाढताना दिसून येते.
एकंदरीतच मासिक पाळी विषयी असलेले समाजातील गैरसमज ,प्रथा परंपरा यांचा परिणाम केवळ महिलांच्या आरोग्यावर होत नाही तर शिक्षण, व्यवसाय, आत्मविश्वास आणि महिलांच्या सर्वांगीन विकासावर सुद्धा होतो.
'कुरमा' प्रथेचा अनुभव समाजबंध’ संस्थेच्या “सत्याचे प्रयोग” शिबिरा दरम्यान मला गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील माडिया गोंड आदिवासी समाजात मासिक पाळीच्या काळात आजही प्रचलित असलेली ‘कुर्मा प्रथा’ प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. या प्रथेनुसार महिलांना पाळीच्या काळात घरात न ठेवता विशिष्ट झोपडीत ठेवले जाते त्याला कुर्मा घर/कुर्मा घुडसे असे म्हटले जाते . तिथे पिण्याचे पाणी, वीज व झोपण्याचीही योग्य व्यवस्था नसते. ऊन, वारा, पाऊस काहीही असो पण महिलांना कुर्मा घरातच रहावे लागते.कुरमा प्रथेचे उल्लंघन केल्यास जात पंचायतीच्या दंडाला बळी पडावे लागते.
उपाययोजनासमाजातील मासिक पाळी विषयी असलेले गैरसमज,अनिष्ट परंपरा दूर करण्यासाठी काही उपाययोजना आपण करू शकतो. जसे की,मासिक पाळी विषयी शाळा,महाविद्यालय आणि गाव पातळीवर कार्यशाळा ,शिबिरे आयोजित करून मासिक पाळी विषयक वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचविणे. भारत सरकारच्या"अस्मिता योजनेची" प्रभावीपणे अंमलबजावणी करून कमी पैशात महिलांपर्यंत सॅनिटरी पॅड पोहचविणे. समाज प्रबोधनाच्या माध्यमातून गैरसमज,अंधविश्वास दूर करणे.कुर्मा प्रथेला तोंड देण्याकरिता आदिवासी लोकांपर्यंत शिक्षण,आरोग्य सुविधा पोहोचवून  त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे.
मासिक पाळी ही पूर्णतः नैसर्गिक, शारीरिक प्रक्रिया आहे . जिचा कुठल्याही देवाशी,धर्माशी अपवित्रतेशी संबंध नाही ."मासिक पाळी विकृती नसून प्रकृती आहे".ज्या पाळीमुळे आपल्या सर्वांचा जन्म होतो ती पाळी अपवित्र कशी असू शकते. पाळी निसर्गाने महिलांना दिलेली सर्वात सुंदर अशी देणगी आहे जी पुरुषांकडे सुद्धा नाही.
आजच्या काळामध्ये मासिक पाळी विषयी वैज्ञानिक दृष्टिकोन घराघरापर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या पूर्वीपासून चालत आलेल्या पाळी विरोधी परंपरा,समज दूर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.कुठलीही लाज न बाळगता मासिक पाळीला "मासिक पाळी" याच नावाने उच्चारण्याची सुरुवात आपण सर्वांनी करण्याची गरज आहे .मासिक पाळी विषयी प्रत्येक व्यक्तीला ज्ञान असणे गरजेचे आहे तेव्हाच कुठेतरी आपण आपल्या आईला, बहिणीला , पत्नीला खऱ्या अर्थाने समजू शकू. त्यांची स्थिती लक्षात घेऊन त्यांना मदत करू शकू.
लेखक: संचित अर्चना धनराज म्हैसकर 
मु.पोस्ट बोरगांव. तालुका जिल्हा यवतमाळ.

No comments