नागपूर, दि. १६ : कविवर्य नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिदिनी डॉ. विनोद राऊत यांच्या 'नामदेव ढसाळ यांची कविता : आस्वाद आणि चिकित्सा' या सम...
नागपूर, दि. १६ : कविवर्य नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिदिनी डॉ. विनोद राऊत यांच्या 'नामदेव ढसाळ यांची कविता : आस्वाद आणि चिकित्सा' या समीक्षाग्रंथाचे नुकतेच प्रकाशन संपन्न झाले.
नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम काव्यसमीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे तर प्रमुख अतिथी म्हणून वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते आणि ग्रंथाचे भाष्यकार म्हणून प्रसिद्ध समीक्षक प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर, डॉ. शैलेंद्र लेंडे, प्रा. संजय घरडे व लेखक डॉ. विनोद राऊत उपस्थित होते.
प्रारंभी, कविवर्य नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते समीक्षाग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर डॉ. विनोद राऊत यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर प्रा. संजय घरडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
प्रस्तुत समीक्षा ग्रंथावर भाष्य करताना प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर यांनी नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे सैद्धान्तिक विवेचन केले. यावेळी ढसाळांच्या 'गोलपिठा' या अगदी पहिल्या कवितासंग्रहापासून तर शेवटच्या 'निर्वाणाअगोदरची पीडा' या कवितासंग्रहापर्यंत त्यांच्या सर्व काव्यसंग्रहातील विकसन डॉ. पळवेकरांनी अधोरेखित केले. पुढे बोलताना ते असे म्हणाले की, ढसाळांनी आपल्या कवितेचा कधीच एक साचा निर्माण होऊ दिला नाही, ते सतत प्रयोगशील राहिले. ढसाळांचे वाङमयीन व्यक्तित्व व त्यांची कविता मराठी काव्यपरंपरेत अगदीच पृथगात्म स्वरूपाची असून ही पृथगात्मता रूढ मराठी समीक्षादृष्टीच्या आवाक्याबाहेरची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु डॉ. राऊत यांनी मात्र ढसाळांच्या कवितेबाबत नोंदवलेली प्रस्तुत ग्रंथातील निरीक्षणे अतिशय महत्त्वाची असल्याचे डॉ. पळवेकर यांनी सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी या ग्रंथाचे प्रारूप व त्याची मांडणी विशद केली.
डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. पळवेकरांच्या मांडणीचा उल्लेख करत ढसाळांनी त्यांच्या काव्यलेखनात कधीही साचेबद्धपणा येऊ दिला नाही. त्यांची कविता सदैव विकसित होत गेली. ही कविता किंवा ढसाळ कुठल्याही एकाच चौकटीत अडकून पडले नाहीत. संपूर्ण मराठी काव्यपरंपरेत ही कविता वेगळी असून या कवितेचे नाते मानवतावादाशी जुळलेले असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सलीम शेख यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. संजय गोहणे यांनी केले. याप्रसंगी नागपुरातील कवी लोकनाथ यशवंत, अरुणा सबाने, सिद्धार्थ मेश्राम, डॉ. नीलकांत कुलसंगे, अनिल चनाखेकर, कोमल ठाकरे, ज्योतिक ढाले यांच्यासह अनेक गणमान्य साहित्यिक तसेच डॉ. राऊत यांच्या मित्र-परिवारातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments